Pages

Wednesday, August 31, 2011

बाबाचा कुरघोडीयोग

रामदेवबाबा आणि त्यांचे आंदोलन यांनी विरोधी पक्षांना ओरड करायला हवा असलेला एक बहुप्रतीक्षित विषय मिळवून दिला आहे. कोलकात्यात झालेल्या डाव्या कम्युनिस्टांच्या बैठकीत अरण्यरुदनाखेरीज काही झाले नाही आणि लखनौत झालेल्या भाजपाच्या बैठकीत पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा ही नित्याची कविता आळवण्यापलिकडे काही घडले नाही. रामदेवबाबांची रामलीला मैदानातून उचलबांगडी करून सरकारने या पक्षांना बागडता यावे असे काही दिले आहे. रामदेवबाबांचे आंदोलन भ्रष्टाचारविरोधी कमी आणि कॉंग्रेसविरोधी अधिक आहे. आपण कॉंग्रेसचा नामशेष करू अशी प्रतिज्ञाच आता त्यांनी केली आहे. ती करत असताना त्यांच्यासोबत उमाभारती, ऋतंभरा यासारखे भाजपचे जुने चेहरे देशाने पाहिले आहेत. सरकारची यासंदर्भातील चूक ही की रामदेवबाबांच्या हेतूचा नीट अंदाज न आल्याने त्यांची नको तशी बडदास्त सरकारने केली. त्यांच्या स्वागताला मंत्र्यांनी जाण्याचे कारण नव्हते. त्यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत सर्व विषयांवर एकमत झाल्यानंतर व तसे त्या बाबांनी लिहून दिल्यानंतर सरकारच्या प्रवक्त्यांनी ते तात्काळ जनतेला सांगणे गरजेचे होते. रामदेवबाबा समझोता करून बदलले व आपल्याकडून सारे सक्तीने लिहून घेतल्याचा कांगावा करू लागले ही बाब जेवढय़ा परिणामकारकपणे सरकारने जनतेला सांगायची तशी ती सांगितली नाही. दिग्विजयसिंगांसारखे कॉंग्रेसचे सरचिटणीस रामदेवबाबांच्या मागे संघ परिवार उभा असल्याचे आरंभापासून सांगत असताना त्यांच्या आंदोलनाचे भगवे स्वरूपही सरकारने घ्यावे तसे लक्षात घेतले नाही. देशात भ्रष्टाचार आहे ही गोष्ट कुणी नाकारत नाही. भ्रष्टाचाराचा पुरावा येताच सरकारी यंत्रणा कामी लागल्या असत्या तर अण्णा-बाबांचे सध्याचे प्रकरण उद्भवलेही नसते. परंतु भ्रष्टाचारात सार्‍याच पुढार्‍यांना आणि पक्षांना रस असल्यामुळे त्याविरुद्ध जबर राजकीय मनोबल उभे करावे असे कोणत्याही राजकारण्याला कधी वाटले नाही. आपापल्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नातच सारे मग्न राहिले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने गेल्या दोन वर्षात अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपद सोडायला लावले, टू जी घोटाळ्य़ात राजा या मंत्र्याला तुरुंगात धाडले, सत्तेवरून पायउतार होण्याचा धोका पत्करून कनिमोझीला तुरुंगवास घडविला आणि कॉमनवेल्थ घोटाळ्य़ात अडकलेल्या कलमाडींनाही बेडय़ा ठोकल्या. भ्रष्टाचाराचा आरोप पुढे येण्याचाच अवकाश की हे सरकार आपल्या कर्तव्याला जागले व सबंधित प्रकरण कायद्याच्या रीतसर स्वाधीन करून मोकळे झाले. परिणामी सरकारविरुद्ध वापरायची आपली आयुधे सरकारनेच अशी वापरल्यामुळे विरोधकांची कार्यक्रमपत्रिका निर्थक झाली. पुढे जाऊन अण्णा आणि बाबा यांनी त्यांचे उरलेसुरले विषयही पळविले. राजकीय पक्षांना त्यांचे बळ जनाधारातून मिळते व हा जनाधार आंदोलनातून मिळत असतो. अण्णा आणि बाबांनी ही आयुधेही आता त्यांच्या हातून काढून घेतली आहेत. रामदेवबाबांची कुरघोडी तर अशी की त्यांनी अण्णांचे लोकपाल विधेयकही गुंडाळल्यात जमा केले. या विधेयकाच्या मसुदा समितीवर बहिष्कार घालण्याचा अण्णांचा निर्णय हेच वास्तव दर्शविणारा आहे. सारांश, विषयपत्रिका हरवलेल्या विरोधकांजवळ अण्णा किंवा बाबा यांच्या मागे त्यांचे झेंडे घेऊन आपला अभिक्रम हरवणे आणि समाजकारणात किंवा व्यायामकारणात गुंतलेल्यांनी तो पळविणे ही राजकारणाची विनोदी अवस्था आपला देश प्रथमच अनुभवत आहे व ती करमणूक करणारीही आहे.

No comments:

Post a Comment