Pages

Wednesday, August 31, 2011

घटनेची पायमल्ली रोखाच..

अण्णा हजारे गांधी नाहीत आणि रामदेवबाबाही जयप्रकाश नाहीत (ते म्हणतात तसे रामलीला मैदान जालियनवाला बागही नाही.) ते दोघे स्वतर्‍ला तसे म्हणवीत नसले तरी आपली अमर्याद प्रकाशमाध्यमे त्यांना गांधी आणि जयप्रकाश करायला निघाली आहेत म्हणून हे नोंदवायचे. स्वातंत्र्याच्या आंदोलानात कॉंग्रेसचे नेतृत्त्व गांधीजींनी स्वीकारले आणि सारा देश त्यांच्या, कॉंग्रेसच्या व आंदोलनाच्या मागे उभा राहिला. जयप्रकाशाच्या आंदोलनाशी एकरुप व्हायला देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपले विसजर्न करून त्याचे बळ वाढविले. अण्णांचे आंदोलन सुरू असताना देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले पक्षही त्यांना नावे ठेवताना आणि आपसात भांडणे करताना दिसले तर रामदेवबाबांचा शोभिवंत सभामंडप दिल्लीत उभा होत असताना आपले राष्ट्रीय पक्ष लखनौ व दिल्लीत पुढल्या निवडणुकांची आखणी करण्यात मग्न होते. त्यातल्या एकाने आपली सध्या चलनात नसलेली गोविंदाग्रज व ऋतंभरासारखी माणसे त्यात पाठविली तर अग्निवेश, किरण बेदी व मेधा पाटकर यासारखी कोणत्याही आंदोलनात केव्हाही सहभागी व्हायला सदैव तयार असलेली रिकामी माणसेही त्यात आलेली दिसली. (नक्षलवाद्यांचा पाठपुरावा अजून पूर्ण न झाल्यानेच कदाचित अरुंधती रॉय तिकडे फिरकल्या नसणार)
मुळात आम्ही सांगू तसा कायदा तुम्ही केला पाहिजे ही अण्णा हजारे यांची मागणीच संविधानावर आघात करणारी व संसदेच्या अधिकाराचा संकोच करणारी होती तर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेल्या इसमाला फाशी देणारा अध्यादेश अगोदर काढा ही रामदेवबाबाची मागणीही आक्रस्ताळी व सांसदीय प्रणालीचा अधिक्षेप करणारी होती. मात्र अण्णांनी त्यांचे आंदोलन कायद्याच्या कक्षेत राहून चालविले. सरकारशी वाटाघाटी केल्या. मार्ग काढला, समिती नेमली आणि तीत स्वतर्‍ सहभागी होऊन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावायला सहकार्याचा हात पुढे केला. रामदेवबाबांचा साराच व्यवहार या तुलनेत उफराटा, फसवा आणि आततायी होता. प्राणायामाचे वर्ग चालवायला रामलीला मैदानाची जागा हवी म्हणून त्यांनी दिल्ली प्रशासनाकडे अर्ज केला. तो करतानाच त्या मैदानाचा वापर राजकारणासाठी व आपल्या लढय़ासाठी करायचा हे त्यांनी ठरविले होते. त्या मैदानावर उभारलेला शाही मंडप आणि त्यात शिजत असलेले श्रीमंती भोजन प्राणायामासाठी वा उपोषणासाठी नव्हते हे सार्‍यांना दिसत होते. (तशीही वजन कमी करून घ्यायला व शरीरातील व्याधी दूर करायला अशा आश्रमात येणारी माणसे काळा पैसा किंवा भ्रष्टाचार याविरुद्धच्या आंदोलनाशी काही घेणेदेणे नसणारीच असतात) मंडपात आलेले चेहरे रापलेले राजकारणी आणि सर्वज्ञात सरकारविरोधी होते. ही माणसे ज्या पद्धतीने बोलत वा वागत होती तो प्रकार त्यांच्यामुळे तिसरे स्वातंत्रय जणु उद्याच उजाडणार असेच पाहणार्‍यांना वाटत होते.
स्वतर्‍ रामदेवबाबा एवढा प्राणायाम करून स्थिर चित्त नाहीत. ते कपिल सिब्बल आणि त्यांच्या सहकार्‍यांशी बोलले वेगळे, त्यांच्याजवळ लिहून दिले ते आणखी वेगळे आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितले ते आणखीच वेगळे. सरकारने आपल्या बहुतेक मागण्या मान्य केल्या असून उपोषणाची शक्यता उरली नाही असे त्यांनीच सार्‍यांना सांगितले. त्यांच्यावतीने लिहून देण्यात आलेले जे पत्र सिब्बल यांनी जनतेला दाखविले तेही अशाच वक्तव्यांवर शिक्कामोर्तब करणारे होते. आता समझोता जाहीर होणार व आंदोलन संपणार असे सार्‍यांना वाटत असतानाच -मी सांगतो तसा अध्यादेश काढा, समिती नको, कायदा हवा- अशी सगळ्य़ांना अचंब्यात टाकणारी हाळी रामदेवबाबांनी दिली. हे घडले कुणामुळे आणि कोणाच्या दबावाखाली? की अण्णा हजारे यांनी समिती मिळविली मी कायदाच मिळवून दाखवतो या ईष्र्येपोटी? केंद्र सरकारला अडचणीत आणण्याची प्रतिज्ञा केलेली माणसे बाबांभोवती होती. -मनमोहन सिंगांनी राजीनामा द्यावा- असा ठराव लखनौत भाजपची कार्यकारिणी करते आणि -मी संघभाजपाचा एजंट नाही- असे सांगत रामदेवबाबा झालेला समझोता मोडित काढतात यातले नाते अशावेळी लक्षात येते.
अण्णांच्या सहकार्‍यांपैकी काहींविषयी अनेकांच्या मनात संशय आहे. त्यांनी मिळविलेली अमाप संपत्ती व राजकीय भूमिका नेहमीच विवादास्पद राहिल्या. अण्णा स्वतर्‍ मात्र या सार्‍यांपासून दूर व मुक्त आहेत. उलट रामदेवबाबा हा हजार कोटींचा बाबा आहे. त्याने मिळविलेली अमाप संपत्ती व हरिद्वारमधील त्याचा शाही आश्रम, स्वच्छ, पांढर्‍या व एक नंबरच्या पैशातून आला आहे याची ग्वाही त्यालाही देता येणारी नाही. त्यांचे प्राणायामाचे वर्ग, औषधांचे कारखाने आणि मिळालेल्या देणग्या यांचे व्यवहार केवळ बँकेमार्फत होतात हे त्यांच्या अनुयायांनाही विश्वासाने सांगता येणार नाही. अशा इसमाला व शांततेची मर्यादा ओलांडू शकणार्‍या त्याच्या आंदोलनाला प्राणायामाच्या नावाने रामलीला मैदान सरकारने वापरू द्यायचे काय? आणि दिले तरी त्याच्या वापराची मुदत संपल्यानंतरही ते त्याच्या ताब्यात राहू द्यायचे होते काय? सरकारला कायदा व सुव्यवस्था यांच्या रक्षणसाठी खंबीर व्हावेच लागते व प्रसंगी तशी भूमिका मोठय़ांविरुद्धही घ्यावी लागते. सरकारने नेमके हेच केले आहे.
त्याला -लोकशाहीचा खून- व -आणीबाणीची आठवण- इथपासून -तियानमेन व जालियनवालाची पुनरावृत्ती- अशी ठोकळेबाज नावे काहींनी दिलीही. मात्र ही नावे देणारी माणसे नुसती पाहिली तरी त्यांचा त्यामागला हेतू जाणकारांच्या लक्षात यावा.

No comments:

Post a Comment