Pages

Wednesday, August 31, 2011

विरोधक कुठे आहेत?

अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली. अण्णांच्या आग्रहावरून त्या समितीचे सहअध्यक्षपद अ‍ॅड. शांतीभूषण या (साडेतीनशे कोटी रुपयांच्या) कायदेपंडिताला सपुत्र दिले. आता रामदेवबाबा नावाच्या दुसर्‍या एका (अकराशे कोटींच्या) योगगुरूने काळ्य़ा पैशाच्या विरोधात मांडलेल्या श्रीमंती उपोषणालाही सरकारने अनुकूल प्रतिसाद दिला व त्याच्याशी मंत्रीस्तरावर चर्चा केली. या बाबाचे माथे हटयोगापायी जरा जास्तीचे वर असल्याने व भ्रष्टाचार्‍यांसाठी फाशी या एका मागणीच्या खाली ते यायला तयार नसल्याने त्या बोलण्यात बिघाड आला व त्याने आपले उपोषण पुढे दामटले. सरकारने मात्र याही स्थितीत वाटाघाटीचे मार्ग खुले व प्रशस्त ठेवण्याची तयारी दर्शविली. आता अण्णा शांत आणि बाबा वातानुकूलित उपोषणात आहेत. या काळात अण्णा आणि बाबाएवढेच सरकारही सक्रिय राहिले आहे आणि देशातील विरोधी पक्षांचे नाकर्तेपणही याच काळात नको तसे ढळढळीतपणे समोर आले आहे. ज्या प्रश्नासाठी आपण लढायचे ते प्रश्न पळवून भलतीच माणसे त्यावर आंदोलने उभारतात आणि लोकही आपल्याला देत नाहीत तेवढा पाठिंबा त्यांना देतात हे मुकाटय़ाने पाहण्याचे प्राक्तन त्यांच्या वाटय़ाला आले आहे. जी प्रसिद्धी माध्यमे परवार्पयत आपल्या दाराशी झुलायची तीही त्या खेडूत अण्णांच्या आणि अर्धनग्न बाबाच्या मागे हिंडताना त्यांना पहावी लागणे ही गोष्ट त्यांच्या हातचा अभिक्रम गेल्याचे व त्यांची कार्यक्रमपत्रिका हरविल्याचे सांगणारी आहे. दिल्लीत आंदोलन आहे आणि सरकार त्याच्याशी वाटाघाटी करते आहे आणि विरोधी पक्ष मात्र परवाच्या निवडणुकीत पडलेली आपली घरे दुरुस्त करण्यात आणि तशा मोडक्या अवस्थेत उद्याच्या लढाईच्या प्रयत्नात अडकले आहेत. भाजपाची अशी बैठक लखनौ तर कम्युनिस्टांची कोलकात्यात सुरू आहे. राजकीय पक्षांना बळ मिळते ते आंदोलनातून. त्यातून त्यांना जनाधार मिळत असतो. पण जनतेचे आंदोलन उभे करण्याचे बळ या पक्षांनी गमावले आहे. अण्णा आणि बाबासारखी माणसे त्यांना या क्षेत्रात मागे टाकू शकली आहेत. जनतेचे आंदोलन आणि जनाधार या दोहोंनाही जनतेच्या विश्वासाचे पाठबळ लागत असते. आमच्या विरोधी पक्षांनी या विश्वासाचे गेल्या काही काळात जे मातेरे केले त्याची ही परिणती आहे. राजकारण संदर्भहीन होण्याचेही हे लक्षण आहे. आम्ही तत्त्वनिष्ठेपायी सारे काही सोडायला तयार आहोत या डाव्या पक्षांच्या तोर्‍यापायी लोकांनी त्यांची साथ सोडली. तर आपल्या नीतिशुद्धतेचा नुसताच डांगोरा पिटणार्‍या भारतीय जनता पक्षाने आपल्या खर्‍या व्यवहाराकडे कोणाचे लक्ष नाही असे वाटून घेऊन भ्रष्टाचाराला एवढी साथ दिली की त्यामुळे त्या पक्षातच दुहीचे राजकारण सुरू झाले. दिल्ली व बंगलोरात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर तर मुंबई-पुण्यात ब्राrाण-ब्राrाणेतर या जुन्या वादावर या पक्षात भांडणे लागली आहेत. त्यात अबोले आहेत, बहिष्कार आहेत आणि नव्या नेत्यांवर अविश्वास दाखवीत जुन्यांची मनधरणी करणे आहे.. बाकीच्या पक्षांना त्यांच्या ‘आरक्षण, राखीव जागा किंवा तशा स्थानिक प्रश्नांच्या’ पलिकडे पाहण्याची गरज नसल्यामुळे त्यांना या आंदोलनांएवढेच दिल्लीशीही फारसे घेणेदेणे नाही.. तात्पर्य, अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांनी राजकारणाचे झेंडे पळविल्याने ते झेंडे आजवर ज्यांच्या खांद्यावर नेहमी दिसले ते खांदे रिकामे झाले आहेत. त्यामुळे त्यांची वाटचालही दिशाहीन झाली आहे. झालेल्या मोडतोडीची जुळवणी करण्याएवढेच जंतरमंतर त्यांच्या हाती उरले आहे. ‘केंद्र सरकार भ्रष्ट आहे किंवा पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे’ अशा कंटाळवाण्या झालेल्या कविता लोकांना ऐकविण्यापलिकडे ते काही करताना न दिसणे हा या नव्या घडामोडीचा दृश्य परिणाम आहे.

No comments:

Post a Comment